बहुगुणी आवळा (Indian Gooseberry)

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बहुगुणी आवळा (Indian Gooseberry)
सौ.दिपाली फरांदे : आंबट, तुरट चवीचे हिवाळ्यात येणारे, हिरव्या रंगाचे फळ. वृक्षवर्गीय औषधी करिता प्रसिद्ध आहे. जीवनसत्व ‘क’ चे भंडार आहे. भारतात सर्वत्र याची लागवड केली जाते.एप्रिल मे मध्ये याच्या फुलांचा बहर येतो, तर हिवाळ्यात फळ येतात. आवळ्याचे लोणचे, आवळा मुरंबा, व आवळा सुपारी आपल्या परिचयाचे आहे.शेतकर्यांना कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारे पीक म्हणजे आवळा.
आवळ्याचा उपयोग
खाण्यासाठी जसा दैनंदिन जीवनामध्ये केला जातो तसाच तो बऱ्याच औषधांमध्ये सुद्धा केला जातो. आपण खूप सारी औषधी रोग बरे होण्याकरिता वापरतो, परंतु आपण आवळा खाण्याने काय उपयोग होतो यापासून अज्ञान आहोत. रोज आवळा खाल्ल्याने सुद्धा आपल्या आसपासही रोग येणार नाही.
आयुर्वेदामध्ये असंख्य रसायनांमध्ये आवळा वापरला जातो. आधुनिक शास्त्रही व्हिटॅमिन सी चा सर्वोत्तम स्त्रोत म्हणून आवळ्याकडे पाहतात. विशेषता ही की ,आवळा शिजवला तरी विटामिन सी नष्ट होत नाही. आवळा आंबट, तुरट, गोड असतो. शितल तसेच पचायला हलका असतो. दाह तसेच पित्त रोग कमी करतो. पोटातील गॅस ,उलटी, शूज थकवा वगैरे त्रासांमध्ये हितकारक असतोच. रक्तात साचलेली विषद्रव्ये दूर करून रक्त शुद्ध करतो.
याच प्रमाणे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र या सप्तधातु मध्ये जाऊन प्रत्येक धातूतील विषद्रव्ये दूर करून सर्वच धातूंना शुद्ध बनवतो. या त्याच्या गुणांमुळे रक्त शुद्ध होऊन रोग प्रतिकार क्षमता वाढते. म्हणूनच आवळा नियमितपणे सेवन करणे आवश्यक आहे. ताजा आवळा उपलब्ध नसेल तर वाढलेल्या आवळ्याची पूड म्हणजेच आवळा चूर्ण औषधांमध्ये वापरावे. आवळा चूर्ण(आवळा पावडर ) मध्ये देखील ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते.
रक्त विकारांमध्ये म्हणजेच नाकाचा घोळणा फुटला असेल, शौचातून रक्त जात असेल ,मूळव्याधीतून रक्‍त जात असेल या सर्व विकारांमध्ये आवळ्याचे चूर्ण किंवा आवळ्याचा रस घ्यावा.
जर डोकेदुखीचा त्रास होत असेल तर आवळ्याचे चूर्ण तूप व खडीसाखर एकत्र करावं सकाळच्या वेळी उपाशी पोटी हे मिश्रण सेवन केल्याने डोकेदुखीचा त्रास नाहीसा होतो.
केसांच्या तक्रारी वर उदाहरणार्थ केस गळणे, केस पांढरे होणे, केस निस्तेज होणे, कोंडा होणे या सर्वांवर आवळा, शंखपुष्पी, ब्राम्ही, जास्वंद यांनी युक्त तेल केसांना लावावं.
काही दिवसांमध्ये केसांची वाढ चांगली होते, केस गळणे थांबते, केसांची वाढ होते व रात्री शांत झोप लागते.
तोंड बेचव,उलटि किंवा मळमळ होत असल्यास आवळ्याचा रस व मध याचे चाटण करावे . तोंडास रुची प्राप्त होते. नियमित सेवनाने बुद्धी व स्मरणशक्ती वाढते म्हणून आवळ्यापासून तयार केलेले पदार्थ आहारात नियमितपणे घ्यावा. नियमित आवळा सेवनाने शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुरळित चालू राहते त्यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होऊन हृदयविकार टाळता येतो. क जीवनसत्व भरपूर कामात असल्यामुळे एक चमचा आवळा चूर्ण व नियमितपणे सेवन केल्यामुळे त्वचा रोग होत नाही.नियमितपणे आवळा सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. हृदय, केस, मास पेशी व शरीरातील अनेक ग्रंथींना बळ मिळतं,त्यामुळे तरुण व्यवस्था जास्त दिवस टिकवून ठेवता येते.
निसर्गाची किमया अगाध आहे हवामानातील बदलाचा मानवी जीवांवर खूपच प्रभाव असतो. त्या बदलाला सामोरे जाण्यासाठी निसर्गच आपल्याला मदत करतो. कार्तिक महिन्यात थंडीला चांगली सुरवात होते. त्यामुळे सर्दी, पडसे, खोकला असे विकार उद्भवतात. क जीवनसत्वाच्या अभावी हे विकार जास्त जोर धरतात. परंतु या दिवसात येणाऱ्या आवळा या फळामुळे ती कमतरता भरून निघते.
हा मध्यम उंचीचा पानझडी वृक्ष असून भारतात सगळीकडे आढळतो. तसेच श्रीलंका , चीन, मलेशिया इथे आढळतो. हे फळ शीतल, तुरट, मुत्रल व सारक आहे. आवळा पित्तशामक, बलदायी आणि कांती सतेज करणारा आहे. आवळ्यात क जीवनसत्व भरपूर असून इतर फळात न मिळणारा तुरट रस हि भरपूर असतो. आरोग्यदृष्ट्या आणि धार्मिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या आवळ्याला खूप महत्व आहे.
निसर्गउपचार पद्धतीत आवळ्याचा औषध म्हणून खूपच उपयोग केला जातो. आयुर्वेदातही आवळ्यापासून निरनिराळी औषधे तयार करतात. दुर्बल हृदय सुधृढ करण्यासाठी आवळ्याचा रस रामबाण औषध आहे. याच्या रसाने ज्ञानतंतू सशक्त होतात आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
स्त्रियांच्या मासिक पाळीच्या विकारात आणि संतती प्राप्ती साठी आवळ्याच्या रसाचा उपयोग केला जातो. पोटामध्ये जंत झाल्यास एक चमचा आवळ्याचा रस आणि एक चमचा ओल्या नारळाचे दूध एकत्र करून जेवणापूर्वी १.५ महिने नियमाने घेतल्यास जंताची तक्रार दूर होते. आव पडणे, जुलाब या विकारावर आवळ्याच्या रसात सुंठ पूड घालून ते चाटण दोन्ही जेवण पूर्वी १ महिना घेतल्यास आतड्याची शक्ती वाढते.
उन्हाळ्यामुळे डोळ्यांची आग होते किंवा डोळे थकतात अश्या वेळी आवळ्याच्या बियांच्या काढ्याने डोळे धुतल्यास हा त्रास कमी होतो आणि डोळ्यांचे स्नायू बळकट होऊन दृष्टी सुधारते. आवाज बसला असेल तर आवळकाठीचे चूर्ण दुधात घालून घेतात. उचकी किंवा श्वास लागत असेल तर आवळ्याचा रस आणि पिंपळाचे चूर्ण एकत्र करून घेतात. खरुज झाल्यास आवळकाठी जाळून ती तेलात खालून त्याचा लेप फोडांवर लावावा. चेहऱ्यावर सुरकुत्या पडू नयेत म्हणून आवळकाठी पाण्यात वाटून ती चेहऱ्याला लावावी.
वातामुळे होणार्‍या सांधेदुखीतीही एक चमचा आवळा चूर्ण आणि एक चमचा गुळ एकत्र करून आल्याच्या रस बरोबर घेतल्याबरोबर सांधेदुखी कमी होते. अर्थात १/२ महिने औषध घेणे आवश्यक आहे. शरीरकांती सतेज होण्यासाठी आणि केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आवळा गुणकारी आहे. आवळा, माका , ब्राम्ही आणि खोबरेल तेल ह्यांच्या मिश्रणापासून केलेले तेल केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे.
इतर सर्व फळांपेक्षा आवळ्यात क जीवनसत्व भरपूर असून त्यामुळे रोगप्रतिबंधक शक्ती वाढते. आवळ्यात लोह तत्व हि भरपूर आहे. १६ केळी, ३ संत्री, किंवा मोसंबी यात जेवढे क जीवनसत्व आहे त्याच्या कितीतरी अधिक क जीवनसत्व छोट्या आवळ्यात आहे.
आवळा सावलीत सुकवला तर त्यातील जीवनसत्व कमी होण्या ऐवजी वाढते. १०० ग्रॅम सुकवलेल्या आवळ्यात २४००-२६००मिली ग्रॅम क जीवनसत्व असते. आरोग्यदृष्ट्या आवळ्याचे विविध उपयोग आहेत. रोग्याला निरोगी करण्यासाठी निरोगी माणसाला जास्त सशक्त करण्यासाठी आणि वृद्धांना उत्साह आणण्यासाठी आवळा म्हणजे कल्पवृक्षच आहे.

Mrs. Dipali Pharande

 

Sahakar Times
Author: Sahakar Times

Leave a Comment

पुढे वाचा