पुणे ( सहकार टाइम्स वृत्तसेवा ) : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आतापर्यंत मोठी घोषणा केली आहे. अर्थमंत्र्यांनी नवीन करप्रणालीत १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्नावर शून्य कराची घोषणा केली. अशाप्रकारे, तब्बल ६३ वर्षानंतर प्राप्तिकर स्लॅबमध्ये बदल झाले आहेत. २०२५ चा अर्थसंकल्प लक्षात घेऊन यावेळी संपूर्ण लक्ष मध्यमवर्गावर केंद्रित करण्यात आले तर याशिवाय गरिबांचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे.
१२.७५ लाखांवर शून्य टॅक्स
२०२५-२६ अर्थसंकल्पादरम्यान १२ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्नावर शून्य कराची अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा पगार १२ लाख रुपये असेल आणि त्याने नवीन करप्रणालीत आयटीआर फाईल केल्यास १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर एक रुपयाही कर भरण्याची आवश्यकता नाही. त्याचवेळी, तुमचे उत्पन्न १२ लाख ७५ हजार रुपये असले तरीही तुम्हाला ‘शून्य’ कर आकारला जाईल, कारण १२ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास तुम्हाला ७५००० रुपयांच्या मानक वजावटीचा (स्टँडर्ड डिडक्शन) लाभ मिळेल. अशा परिस्थितीत १२ लाख ७५ हजार रुपयांवर कोणताही कर भरावा लागणार नाही. म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न १२.७५ लाखांपर्यंत असल्यास तुम्हाचे संपूर्ण उत्पन्न करमाफ होईल.
असं करा बचतीचे कॅल्क्युलेशन
नवीन कर स्लॅबनुसार आता १२ लाख रुपयांपर्यंत कमाई केल्यास ८०,००० रुपयांची बचत होऊ शकेल. उदाहरणार्थ जुन्या टॅक्स स्लॅबअंतर्गत एखाद्या व्यक्तीचा पगार १२ लाख रुपये असेल तर त्यावर ८०००० रुपये टॅक्स भरावा लागायचा पण टॅक्स स्लॅबमधील नवीन बदलांनंतर आता शून्य होईल. त्याचवेळी, नवीन टॅक्स स्लॅबनुसार, तुमचे उत्पन्न १८ लाख रुपये असेल तर ७०,००० रुपयांची बचत होईल आणि २५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर १.१० लाख रुपयांची बचत होईल.












